पालघर: तृतीय पंथातील व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यांच्यासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालघर जिल्हा प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी तयार करण्याचे आदेश जारी केले आहेत. या समुदायातील लोकांना अंतिम संस्कार करण्यात अडचणी येत असल्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. तृतीयपंथीयांना अंतिम संस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत गेल्यावर होणाऱ्या छळाची तक्रार करण्यासाठी नुकतीच या समुदायातील काही प्रतिनिधींनी पालघरचे जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांची भेट घेतली होती.
जिल्हाधिकार्यांनी महानगरपालिका, नगर परिषदा, प्रभाग अधिकारी आणि नगर पंचायतींना तृतीय पंथीयांना सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार नाकारला जाणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसे न झाल्यास ‘ट्रान्सजेंडर पर्सन प्रोटेक्शन’ (प्रोट) कायद्यांतर्गत संबंधित अधिकार्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.