
महानगरपालिकांच्या निवडणूक आरक्षण सोडत कार्यक्रम येत्या 31 मे 2022 रोजी होणार आहे. आगामी काळात नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.
दरम्यान, यासाठी आरक्षण आणि सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार अनुसुचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडत काढण्यासाठी सोबतच्या परिशिष्ट-ड (मराठी)व परिशिष्ट-इ इंग्रजीमधील नमुन्यात जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे. त्याआधी स्थानिक वर्तमानपत्रं, वेबसाईट, सूचना फलक इत्यादी 27/5/2022 पर्यंत प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडत काढणे यासाठी 31/5/2022 ची वेळ देण्यात आली आहे.
सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करणे त्याची स्थानिक वर्तमानपत्रं, वेबसाईट, सूचना फलक इत्यादी प्रसिद्धी द्यावी यासाठी 01.06.2022 ची मुदत देण्यात आली आहे. तर, प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी 1 जून ते 6 जून पर्यंत देण्यात आला असून, आरक्षण निश्चितीबाबत प्राप्त झालेल्या हरकती सूचनांवर विचार करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण सोबतच्या परिशिष्ट-ड मधील नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे यासाठी 13 जून 2022 ची मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्यातील रखडलेल्या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टाने सुनावणीवेळी राज्य निवडणूक आयोगाला जिथं पाऊस नसेल तिथं निवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळं पावसाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका टप्प्याटप्प्यानं होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ओबीसी आरक्षणामुळं राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सध्या सुप्रीम कोर्टात निवडणुकांबाबत सुनावणी सुरु आहे.