Home Politics ही निवडणूक म्हणजे नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातील लढाई: फडणवीस

ही निवडणूक म्हणजे नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातील लढाई: फडणवीस

ही निवडणूक म्हणजे नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातील लढाई: फडणवीस

पुणे: प्रतिनिधी

ही लोकसभा निवडणूक म्हणजे पंतप्रधान पदाची लढाई आहे. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातील लढाई आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे यासाठी मतदार प्रत्येक ठिकाणी मतदार महायुतीच्या उमेदवारांना मतदान करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमाशी बोलताना व्यक्त केला.

माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक धैर्यशील मोहिते पाटील यांच्या बंडा नंतर काहीशी कठीण झाल्याचे विधान सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना फडणवीस म्हणाले की, निवडणूक माढ्याची असो, बारामतीची असो व सातारा, सांगलीची असो, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे अशी जनतेची इच्छा आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर मतदारांचा विश्वास आहे. त्यामुळे त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदार सर्वच मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना मतदान करतील.

‘वस्तुस्थितीची जाणीव उरलेली नाही’

महाराष्ट्रातील सर्व जागा महाविकास आघाडी जिंके तर देशभरात 45 जागा भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी जिंकेल, या शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विधानाचाही फडणवीस यांनी समाचार घेतला. त्यांना वस्तुस्थितीची जाणीव उरलेली नाही, हेच त्यांच्या या विधानातून दिसून येते, असे फडणवीस म्हणाले.

‘कोण संजय राऊत?’

महाराष्ट्रातील एकूण जागांपैकी 35 जागा महाविकास आघाडीला मिळतील, या शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या दाव्याचीही फडणवीस यांनी खिल्ली उडवली. कोण संजय राऊत, या सवालाचा फडणवीस यांनी पुनरुच्चार केला.