
‘सरकारने आमच्याशी चर्चा करावी ; आंदोलन तोडण्याचा प्रयत्न करू नये’
दिल्ली ! प्रतिनिधी
राज्यातील ट्रक, टेम्पो चालकांच्या विरोधात अन्यायकारक कायदा आणलेला रद्द करावा, या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरूच आहे. करणे आमच्याशी चर्चा करून योग्य तोडगा काढावा. आंदोलन तोडण्याचे प्रयत्न करू नयेत. जुलमी कायदा रद्द होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा निर्धार ऑटो, रिक्षा, बस, ट्रक, टेम्पो फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारने हिट अँड रन प्रकरणी 3 जानेवारी पासून दिल्ली जंतर मंतर येथे बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनासाठी देशभरातील ऑटो, बस, ट्रक, टेम्पो ड्रायव्हर संघटनेचे प्रतिनिधी दिल्ली येथे दाखल झाले आहेत. या वेळी मार्गदर्शन करताना बाबा कांबळे बोलत होते.
बाबा कांबळे म्हणाले की, देशभरातील प्रवासी व मालवाहतूक चालक-मालकांचे आंदोलन सुरू राहणार आहे. कोणीही माघार घेतलेली नाही. देशातील 25 कोटी चालक-मालकांचे आमची संघटना प्रतिनिधित्व करत आहे. केंद्राने हिट अँड रन प्रकरणी दहा वर्षे शिक्षा व सात लाख रुपये दंड करण्याचा कायदा केला आहे. तसेच राष्ट्रीय चालक आयोग, वेल्फेअर बोर्ड, ड्रायव्हर डे व इतरही प्रश्न महत्त्वाच्या प्रश्नांवर आंदोलन सुरू आहे. याच प्रश्नांवरती ड्रायव्हर आक्रमक झाले आहे. मूळ प्रश्नांवर चर्चा करावी. मोठे उद्योगपती ट्रान्सपोर्ट मालकांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्यात आले आहे असे चुकीच्या पद्धतीने शासन जाहीर करत आहे. ही देशातील 25 कोटी चालक-मालकांची दिशाभूल आहे. ज्यांचा आंदोलनाशी काही संबंध नाही, असे देशातील मोठे उद्योगपती भांडवलदार ट्रान्सपोर्टर्स यांना हाताशी धरून आंदोलन घडवण्याचा प्रयत्न केल्यास हे आंदोलन अधिक उग्र होईल, असा इशारा मालवाहतूक प्रवासी चालक-मालकांच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिला.
पिंपरी चिंचवड, पुणेसह महाराष्ट्रातून पाठिंबा
कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांचे दिल्ली येथे 3 जानेवारी 2024 पासून जंतर-मंतरवर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व केंद्र सरकार ने हिट अँड रन कायद्यास विरोध करण्यासाठी पिंपरी चिंचवड, पुणे आणि महाराष्ट्रातून ऑटो व ट्रक टेम्पो चालकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. संबधित आरटीओ कार्यालयावर आंदोलन करून पाठिंबा देण्यात आला आहे.
पिंपरीतील आंदोलनात बाळासाहेब ढवळे, लक्ष्मण शेलार, सोमनाथ कलाटे, संतोष गुंड, शुभम तांदळे, विनायक ढोबळे, हिराराम गवारे, तुषार लोंढे, अजय साळवे, रोहिदास पिंगळे, पप्पु गवारे, अविनाश जोगदंड, दादा किवळे, देवा चव्हाण, घरकाम महिला अध्यक्षा आशा कांबळे, मधुरा डांगे, राणी तांगडे, अंजली कांबळे आदी सहभागी झाले होते.
संघटनेच्या मागण्या
अपघात झाल्यास चालकाला दहा वर्षांची शिक्षा आणि 7 लाख रुपये दंड असा असलेला काळा कायदा सरकारने तात्काळ मागे घ्यावा. देशातील सर्व चालक आणि मालकांसाठी राष्ट्रीय कल्याण मंडळाची स्थापना करावी. त्याद्वारे सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा, मुलांना शिक्षणाच्या सुविधा आणि वृद्धापकाळात पेन्शन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. राष्ट्रीय चालक आयोग स्थापन करावा. सरकारने देशभरात चालक दिन साजरा करावा. दिल्लीत चालकांसाठी राष्ट्रीय स्मारक बांधावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.