
- साहित्य अकादमीच्या ‘भारतीय साहित्याचे निर्माते’ या मालिकेत पुस्तकाचा समावेश.
- आणखी वीस वर्षांमध्ये भाषांतरित चरित्र प्रसिद्ध होणार
पुणे : प्रतिनिधी
संत वाङ्मय आणि बहुभाषा अभ्यासक मनीषा बाठे लिखित समर्थ रामदासांवरील मोनोग्राफ (लघुप्रबंध/तात्त्विक चरित्र) साहित्य अकादमीकडून पुस्तकरूपात प्रकाशित करण्यात आला आहे. हे पुस्तक साहित्य अकादमीच्या ‘भारतीय साहित्याचे निर्माते’ या लोकप्रिय मालिकेत समाविष्ट झाले आहे. अशी पुस्तक-मालिका ही अकादमीतर्फे मूळ लेखन भाषेशिवाय एकूण २० भाषांमध्ये भाषांतरित केली जाते. त्यामुळे हे पुस्तकही २० भाषेत जाणार आहे.
पुस्तकाच्या लेखिका मनीषा बाठे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
समर्थ रामदासांचे विचार, जीवनकार्य, संप्रदाय, भारतभ्रमण, दासबोध आदी ग्रंथनिर्मिती यांचा मागोवा या पुस्तकात घेण्यात आल्याने ते महत्त्वाचा दस्तावेज ठरले आहे.
साहित्य अकादमीने २०२० मध्ये या विषयाच्या लेखनासाठी मनीषा बाठे यांची निवड केली होती. सदर सैद्धांतिक प्रबंध समीक्षणादी प्रक्रियेनंतर ३ वर्षांनी प्रकाशित केला जात आहे. याआधी साहित्य अकादमीच्या ‘भारतीय साहित्याचे निर्माते’ या लोकप्रिय मालिकेत मराठीतील ज्ञानदेव, नामदेव, केशवसुत व दत्तकवी आदींबाबत मोनोग्राफ प्रसिद्ध झाले आहेत. आता याच मालिकेत समर्थ रामदासांचे तत्त्वज्ञान प्रथमच प्रकाशित होत आहे. समर्थांचे हे तात्त्विक चरित्र ९६ पानी व अंदाजे २९ हजार शब्दांचे आहे.
‘४०० वर्षे अस्तित्वात असलेल्या संप्रदायाचा सन १८५२ पासून उपलब्ध असलेला प्रकाशित वाङ्मयीन इतिहास आणि एकूण ४०० वर्षांचा संप्रदायाचा मागोवा हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. समर्थ रामदासांच्या जीवनकार्यासोबत मध्ययुगीन हस्तलिखित साधनांचा संदर्भ, रामदासांची तपश्चर्या, लेखनारंभ ते अनुयायांचे शिक्षण, संप्रदाय स्थापनेमागची पूर्वपीठिका, रामभक्त ते रामोपासक हा प्रवास, पंजाबपर्यंतच्या भारतभ्रमणाचे पुरावे आदी या पुस्तकात देण्यात आले आहेत. रामदासांचे महाराष्ट्रबाहेरील समकालीन उल्लेखही यात समाविष्ट आहेत. चरित्रात ज्ञानोपासक व्यवस्था हे स्वतंत्र प्रकरण असून यात रामदासी संप्रदायाची सैद्धांतिक धारणाही सविस्तर दिलेली आहे,’ असे लेखिका मनीषा बाठे यांनी सांगितले.
‘भारतीय साहित्याचे निर्माते’ या लोकप्रिय मालिकेत या लघुप्रबंधाचा समावेश झाल्याने तसेच २० भाषांत हे पुस्तक जाणार असल्याने केलेल्या अध्ययन-संशोधनाची फलश्रुती लाभत आहे’, अशी प्रतिक्रिया मनीषा बाठे यांनी व्यक्त केली. ‘रामदासी संप्रदायाच्या ‘रामोपासना, बलोपासना व ज्ञानोपासनेच्या प्रशिक्षणाचे केंद्र असलेल्या मठांचा विस्तार हा महाराष्ट्रासह अकरा राज्यांत व्यापला होता. या मठांना तीर्थक्षेत्राचे स्वरूप न देता ‘लोकशिक्षणाची’ प्रेरक श्रद्धास्थाने बनवीत, या ‘रामदासी मठरचना’ समर्थांच्या कारकीर्दीतच नव्हे तर नंतरही तीन शतके अव्याहत विस्तारत आहेत. स्थानिक भाषांमधील हस्तलिखित नोंदी पाहिल्या तर या मठांचे कार्य हे ‘आधुनिक वैचारिक चळवळीप्रमाणे’ होते याची साक्ष मिळते’, असे लेखिका मनीषा बाठे यांनी म्हटले आहे.
साहित्य अकादमीतर्फे ‘मागील वीस वर्षांत, २० भाषांमध्ये लिहिणाऱ्या व्यक्तींवरील भारतभरातील एकूण १२० तात्त्विक चरित्रे/ प्रबंध (मोनोग्राफ) प्रकाशित झालेली आहेत.
मनीषा बाठे यांच्याविषयी
लेखिका मनीषा बाठे या रामदासी वाङ्मयाच्या संशोधनपर वस्तुनिष्ठ लेखन करणाऱ्या अभ्यासक आहेत. त्यांनी एक दशकाहून अधिक काळ विविध राज्यांतील शासकीय आणि अन्य हस्तलिखित दफ्तरे तसेच रामदासी मठांतील वाङ्मयावरील संशोधनातून लिहिलेल्या ग्रंथांना विविध सन्मानांसह महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कारही लाभलेला आहे.