Home Politics संविधान बदलले जाणार हा काँग्रेसचा जुमला : देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

संविधान बदलले जाणार हा काँग्रेसचा जुमला : देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

संविधान बदलले जाणार हा काँग्रेसचा जुमला : देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

नागपूर: प्रतिनिधी

तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यावर संविधान बदलण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोणताही इरादा नाही. भाजपा पुन्हा सत्तेवर आल्यास संविधान बदलले जाणार हा काँग्रेसचा जुमला आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना  केला.

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान होते म्हणून एक चहा विकणारा मुलगा पंतप्रधानपदी बसू शकला, असे विधान मोदी यांनी केले होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रमुख पदी मोदी यांची निवड करण्यात आल्यानंतर त्यांनी प्रथम संविधानाचे पूजन केले आणि नंतर पद स्वीकारले. असे असताना मोदी यांच्याकडून संविधान कसे बदलले जाईल, असा सवालही फडणवीस यांनी केला.

काँग्रेसला विकासाबद्दल काही बोलता येत नाही. आपण केलेली जनहिताची कामे पुढे करता येत नाहीत. त्यामुळे असले जुमले काढून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम काँग्रेसकडून केले जात आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. मतदारांचा मोदींवर विश्वास असून ते पुन्हा मोदींनाच मतदान करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेससाठी जाहीरनामा हा केवळ एक कागद आहे. जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करायची नसतात अशी त्यांची धारणा आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपच्या जाहीरनामा यावर टीका केली आहे. मात्र, त्यांच्या कर्नाटकात सत्तेवर आल्यापासून काँग्रेसने किती आश्वासने पूर्ण केली ते सांगावे, असे आव्हानही फडणवीस यांनी दिले. छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल प्रदेश या राज्यात सत्ता मिळूनही काँग्रेसला त्यांनी जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करता आलेली नाही, असा दावाही त्यांनी केला.