पुणे: प्रतिनिधी
आम्ही भारताचे लोक… या शब्दांनी सुरु होणारे भारतीय संविधान भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या अधिकाराचे रक्षण करते आणि त्याला विकासाची समान संधी देते. मात्र, आजची परिस्थिती पाहता देशाची लूट अधिक वेगाने करता यावी यासाठी संविधान बदलण्याची भाषा बोलायला सत्ताधार्यांनी सुरुवात केली आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, बँका, LIC, रेल्वे कवडीमोल भावात देशी-विदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांना विकून टाकण्यात येत आहेत.
अशा परिस्थितीत आम्हा संविधानप्रेमी नागरिकांना वाटते की संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी ही आपली आहे, असे मत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी व्यक्त केले. निमीत्त होते इंडिया फ्रंट आयोजित ‘एक राखी संविधानाची’ या कलाकार कट्ट्यावरील कार्यक्रमाचे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगताना म्हटले की, रक्षाबंधनाला आपल्या रक्षणकर्त्या संविधानाला राखी बांधून त्याचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेऊया आणि खर्या अर्थाने देशप्रेमी बनूया. भावा बहिणीच्या नात्यापलीकडील संविधानाशी आपलं नातं सुद्धा आपलं जपलं पाहिजे, असं पुढे ते म्हणाले. संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्षता जिंदाबाद, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सिख, इसाई; हम सब बहने हम सब भाई, या घोषणा यावेळी घेण्यात आल्या. तसेच साने गुरुजींचा ‘खरा तो एकची धर्म’ हे गाणे यावेळी सादर करण्यात आले.
‘मी समाजात एकता-बंधुता-प्रेम पसरवण्यासाठी पुढाकार घेईन. समाजात द्वेष पसरवणाऱ्या राजकारणाचा आणि प्रसारमाध्यमांचा विरोध करेन,’ अशी प्रतिज्ञा सर्व उपस्थितांनी घेतली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी संविधानातील मूल्यांच्या स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, समता, बंधुता अशा प्रतीकात्मक राख्या संविधानाला बांधल्या व एकमेकांनाही बांधून रक्षाबंधन उपक्रम साजरा केला.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय मोरे, लोकायतचे नीरज जैन, अलका जोशी उपस्थित होते. सूत्रसंचालन विशाल बागुल यांनी केले. आभार सचिन आडेकर यांनी मांनले.