
मुंबई: प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटासह स्वपक्षीय नेतृत्वावर आगपाखड करणाऱ्या संजय निरुपम यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे..
निरुपम हे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचे आग्रही दावेदार होते. या मतदारसंघात मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे गजानन कीर्तीकर यांनी निरुपम यांचा पराभव केला होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात गेले. मात्र, त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर हे उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठावंत राहिले. महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे गेल्यामुळे ठाकरे गटाने अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली.
जागावाटपाबाबत अंतिम चर्चा होण्यापूर्वीच ठाकरे यांनी या मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केल्यामुळे संजय निरुपम संतप्त झाले. त्याचप्रमाणे हा मतदार संघ शिवसेनेकडे गेल्यामुळे त्यांनी स्वपक्षीय नेत्यांनाही फैलावर घेतले. मागील निवडणुकीत पराभूत होऊनही आपण या मतदारसंघात सतत कार्यरत राहिलो. त्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढविणे हा आपला हक्क आहे. ठाकरे यांच्या दबावाला बळी पडून काँग्रेस नेत्यांनी हा मतदारसंघ शिवसेनेला सोडला. मुंबईतून काँग्रेस हद्दपार करणे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उद्दिष्ट आहे. आपल्या पक्षाचे नेते त्यांनाच हातभार लावत आहेत, असे आरोप निरुपम यांनी पत्रकार परिषदेत केले.
उद्धव ठाकरे यांच्या दबावाला बळी पडणे म्हणजे आपल्याच पक्षाला श्रद्धांजली वाहण्यासारखे आहे, अशा कठोर शब्दात टीका करतानाच निरुपम यांनी, आपल्याला गृहीत धरू नका आपल्याकडे अनेक पर्याय खुले आहेत. आपल्या उमेदवारीच्या मागणीची दखल योग्य वेळी घेतली गेली नाही तर इतर पर्याय स्वीकारण्यास आपण मोकळ्या आहोत, असा इशाराही त्यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर निरुपम यांची काँग्रेस मधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.