
मुंबई: प्रतिनिधी
श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही सुसंग असलेली शिकवण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ या दिव्य कहाणीने प्रेक्षकांच्या मनाच्या तारा छेडल्या आहेत. आत्तापर्यंत या मालिकेत प्रेक्षकांनी श्रीरामजन्म, गुरुकुलातून परत आल्यानंतर आपला पिता, राजा दशरथाशी झालेली त्याची भेट, त्राटिका राक्षसीशी त्याने केलेले युद्ध पाहिले आहे. आणि आता प्रेक्षक सीता-स्वयंवराचा सुंदर आणि महत्त्वाचा प्रसंग पडद्यावर अनुभवत आहेत.
एका शापामुळे शिळा होऊन पडलेल्या अहिल्येचा उद्धार केल्यानंतर भगवान श्रीराम विश्वामित्र ऋषींसोबत मिथीला नगरीत येऊन पोहोचतात. येथे जनक राजाने आपल्या महालात योजलेल्या सीता स्वयंवरात श्रीराम सहभागी होतात. जनक राजा पण जाहीर करतो की, जो कुणी शिव धनुष्य उचलू शकेल, त्याला त्याची कन्या सीता वरमाला घालेल. श्रीराम केवळ ते धनुष्य उचलत नाहीत तर त्याला प्रत्यंचा लावून ते वाकवतात सुद्धा आणि ते धनुष्य मोडून पडते! अशाप्रकारे, सीता श्रीरामाशी विवाहबद्ध होते आणि सीता स्वयंवराची सुखद सांगता होते.
या मालिकेत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत प्राण ओतणाऱ्या अभिनेता सुजय रेऊने या भूमिकेसाठी त्याने कशी तयारी केली तसेच ही केवळ एक भूमिका नसून एक मोठी जबाबदारी आहे असे त्याला का वाटते हे मनमोकळेपणाने सांगितले.
तुला जेव्हा श्रीरामाची भूमिका देऊ करण्यात आली, तेव्हा तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती?
जेव्हा मला हे समजले की, ‘श्रीमद् रामायण’ मालिकेत श्रीराम या आपल्या सर्वांच्या आराध्य देवाच्या भूमिकेसाठी माझी निवड करण्यात आली आहे, तेव्हा मी भारावून गेलो. एकाच वेळी आनंद, रोमांच आणि सुखाचा अनुभव मला आला. सगळ्यात आधी मी देवाचे आभार मानले, कारण हा मला मिळालेला देवाचा आशीर्वादच होता. माझ्या या प्रवासाची सुरुवात ऑडिशनच्या एकामागून एक अनेक फेऱ्या आणि मॉक शूटने झाली. कारण शौर्य आणि गुणांची खाण असलेल्या साक्षात श्रीरामाची भूमिका करताना शब्दांमधून आणि शब्दांशिवाय योग्य भावना प्रकट करणे फार गरजेचे होते. अखेरीस जेव्हा श्रीरामाच्या भूमिकेसाठी माझी निवड नक्की झाल्याचे मला समजले, मी खरोखर निःशब्द झालो! हा सगळा अनुभव मला नतमस्तक करणारा होता, कारण ही भूमिका मिळाली म्हणजे मला जणू सर्वस्व मिळाले होते. आणि हाच उत्साह हा प्रवास संपेपर्यंत, शूटिंगच्या शेवटच्या दिवसापर्यंत असाच राहील.
श्रीरामाची व्यक्तिरेखा साकारण्याच्या जबाबदारीकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन कसा होता आणि अशा लक्षणीय भूमिकेसाठी तयारी करताना तू काय काय केलेस?
श्रीरामाची भूमिका करणे ही खचितच एक मोठी जबाबदारी आहे कारण राम हा साक्षात मर्यादा पुरुषोत्तम आहे, एक आदर्श पुरुष आणि नरश्रेष्ठ! श्रीरामाच्या हृदयातील करुणा आणि आत्मीयता त्याच्या डोळ्यांमध्ये दिसते. त्याच्या आचारणातून त्याचे संपूर्ण अस्तित्व जाणवते. त्याचे हे सर्व गुण ध्यानात घेऊन त्याची भूमिका करताना कोणतेच प्रयत्न बाकी ठेवायचे नाहीत, याची खबरदारी मी घेतली. तयारीचा एक भाग म्हणून श्रीरामाकडे मी एक भावना म्हणून बघू लागलो- केवळ एक देव किंवा मनुष्य नाही. मी अनेक पुस्तके वाचली- आशुतोष राणाचे ‘राम राज्य’, अॅमी गांधीचे ‘रामायण अनरॅव्हल्ड’ वाल्मिकी रामायण तसेच सोशल मीडियावर मी अनेक पौराणिक वक्त्यांना फॉलो केले. या सगळ्याचा मला खूप उपयोग झाला. या व्यतिरिक्त मी अभिनय कार्यशाळांना हाजरी लावली, ज्यामध्ये रजित कपूरने आम्हाला ही व्यक्तिरेखा कशी प्रभावी पद्धतीने साकारावी याचे धडे दिले.
अशी भूमिका करताना अभिनेत्यामध्ये बदल घडून आल्याचे अनुभव बऱ्याचदा आपण ऐकतो, त्याप्रमाणे, श्रीरामाची भूमिका करताना तुझ्या आयुष्यात काही बदल घडले का?
मला वाटते, सगळ्यात मोठा धडा आणि श्रीरामाचा मुख्य गुण जो मी स्वतःमध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहे, तो म्हणजे निःस्वार्थ भावना. माझ्यात हा एक मोठा बदल मी अनुभवतो आहे. आता माझ्या जीवनात कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाताना मी श्रीरामाची शिकवण लागू करण्याचा प्रयत्न करतो. मी श्रीरामाचा आणखी एक गुण स्वीकारला आहे, तो म्हणजे धैर्य. त्यामुळे, हो- ही लक्षणीय भूमिका करताना मी अनेक गोष्टी शिकत आहे आणि जरूर पडेल तिथे त्यांचा प्रयोग देखील करत आहे.
या मालिकेसाठी आवश्यक ती भाषा आणि देहबोली याविषयीचा तुझा अनुभव आम्हाला सांग. श्रीरामाची भूमिका करताना या बाजू तू कशा सांभाळतोस?
खरोखर हालचाली आणि भाषा या बाबतीत हा संपूर्ण अनुभव अगदी आगळावेगळा आहे. आणि एक अभिनेता म्हणून या प्रक्रियेत मला खूप आनंद मिळाला आहे. तो विशिष्ट पोशाख परिधान केल्यानंतर आणि या भूमिकेत स्वतःला झोकून दिल्यानंतर मी जणू दुसऱ्याच विश्वात पोहोचतो. श्रीरामाची भूमिका करायची म्हणजे त्याच्यातील करुणा, पावित्र्य आणि परिपूर्णता साध्य करायची. माझे शब्दोच्चार साफ करण्यासाठी मी खूप वेळ दिला आहे आणि कष्ट घेतले आहेत. माझ्या टीमने देखील खूप मेहनत घेतली आहे, जेणे करून चित्रण अस्सल वाटावे. निर्माते आणि आमच्या टीमचा हा प्रयत्न आहे की, हे रामायण आजच्या प्रेक्षकाला काळ-सुसंगत वाटावे. त्यामुळे आमचे कथाकथन नावीन्यपूर्ण आणि रोचक आहे. असे असले तरी, रामायणाचा गाभा मात्र तसाच आहे. फक्त मांडणी सुसंबद्ध करून आजच्या प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न ‘श्रीमद् रामायण’च्या सादरीकरणातून केलेला आहे. ते अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल. पिढ्यांमधील दरी भरून काढून, मागच्या पिढीप्रमाणेच पुन्हा एकदा सर्वांना टेलिव्हिजनवर रामायण बघणे आनंददायक वाटावे यासाठी आमची टीम झटत आहे.
पुढील महत्त्वाचा कथाभाग हा सीता स्वयंवराचा आहे. तुझी सह-कलाकार प्राची हिच्यासोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा आहे?
हा संपूर्ण कथाभाग म्हणजे एक अद्भुत अनुभव आहे. आम्ही हे दृश्य खूप भव्य स्वरूपात साकारले आहे. वेगवेगळ्या भावना यावेळी प्रदर्शित झाल्या. लोकांमधील हर्षोल्लास, रामाने शिवधनुष्य भंग केल्यावर सीतेला झालेला आनंद आणि या उन्मादक वातावरणातही श्रीरामाचे गांभीर्य आणि आपल्याला प्रिय अशी अर्धांगिनी लाभल्याचा आनंद. माझ्यासाठी हा एक वेगळाच अनुभव होता. प्राची फार समजूतदार सह-कलाकार आहे. राम आणि सीता यांच्यातील प्रेमाचा परिचय देणारा एकमेकांबद्दल आदर, विश्वास आणि एकमेकांविषयीचा समजूतदारपणा साकारण्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे.