
पुणे: प्रतिनिधी
‘नील मल्टी इव्हेंट्स’च्या वतीने आयोजित ‘श्रावण रंग, सप्तरंग’ या विशेष कार्यक्रमाला गुरुवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला.१४ सप्टेंबर रोजी निवारा सभागृह, नवी पेठ येथे सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम झाला.
मधुमेह तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत कणसे यांनी ‘मधुमेह: समज, गैरसमज’ या विषयावर मार्गदर्शन केले तर पर्यावरण अभ्यासक सतीश खाडे यांनी ग्लोबल वॉर्मिग च्या संदर्भात ‘सगळं जग टायटॅनिक चे प्रवासी’ या विषयावर मागदर्शन केले.
याच कार्यक्रमात डॉ. अनघा राजवाडे यांनी ‘आया सावन झुमके ‘ हा हिंदी ,मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. या सादरीकरणाला देखील चांगला प्रतिसाद मिळाला.
क्रांती शहा यांनी सूत्रसंचालन केले. ‘नील मल्टी इव्हेंट्स’ च्या संस्थापक नीलम बेंडे, रवींद्र बेंडे यांनी स्वागत केले.अर्चना कोतकर, मोहन पुजारी, विठ्ठल काटे, दीप्ती पुजारी, ईश्वरी कणसे, विनया देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
सतीश खाडे म्हणाले,”ग्लोबल वॉर्मिगमुळे कॅलिफोर्नियामध्येही दुष्काळ पडू लागला आहे. दुष्काळ सर्वांच्या दारात आला आहे. आंबे झाडावरून गळून जात आहेत. अन्नधान्य उत्पादनावर परिणाम होवू लागला आहे. जंगले जळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. भारताने कोळशातून येणाऱ्या औष्णिक उर्जा ऐवजी हरित उर्जेकडे जायला हवे. खनिजांच्या खाणीवर निर्बंध आणायला हवे. वैय्यक्तिक पातळीवर आपण जीवनशैली बदलायला हवी. पाण्याचा वापर कमी केला पाहिजे.
यावेळी पर्यावरण जपणुकीची सामूहिक शपथ घेण्यात आली. डॉ. चंद्रकांत कणसे म्हणाले, उपचार हे औषधकेंद्रित झाले आहेत. कृत्रिमरित्या तयार केलेले पौष्टिक पदार्थ पावडरच्या स्वरूपात विकले जात आहेत. पावडर, प्रोटीन बिस्कीटमध्ये कोणते घटक आहेत, हे तपासले पाहिजे’. रिकाम्या पोटी रक्तशर्करा तपासण्याबरोबर जेवणानंतर २ तासाची शर्करा तपासली पाहिजे. रक्तदाब आणि मधुमेह हे भाऊ आहेत. रक्तवाहिन्या कमकुवत होण्याने त्रास वाढतो. जेवणाच्या वेळा पाळणे, व्यायाम, व्यवस्थित झोप घेणे आवश्यक आहे.