
फडणवीस यांच्याकडून आश्वासन मिळाल्याचा आठवले यांचा दावा
गडचिरोली : प्रतिनिधी
राज्यात लोकसभा निवडणुकीत रिपाइंला योग्य वाटा मिळाला नसला तरी विधानसभा निवडणुकीत ७ ते ८ जागा देण्याचे आश्वासन भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला दिले असल्याचा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.
आठवले यांनी मंगळवारी गडचिरोलीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महायुतीचे उमेदवार खासदार अशोक नेते, आमदार डॅा.देवराव होळी, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, गोवर्धन चव्हाण, रिपाइंचे नेते विजय आगलावे, प्रशांत खोब्रागडे, प्रामुख्याने उपस्थित होते.
भाजपने या लोकसभा निवडणुकीत ४०० वर खासदार निवडून आणण्याचा संकल्प करण्यामागे संविधान बदलले जाण्याची भीती काँग्रेसकडून पसरविली जात आहे. परंतु, असे करण्यामागे केवळ मतदारांची दिशाभूल करणे हा उद्देश असून कोणीही संविधान बदलवू शकत नाही. काँग्रेस ‘डिव्हाईड अॅन्ड रूल’, अर्थात फोडा आणि झोडा या धोरणानुसार वागत आहे, असा आरोप आठवले यांनी केला.
यावेळी आठवले यांनी संविधान बदलविण्यासंदर्भात विधान करणारे कर्नाटकमधील खासदार हेगडे यांच्यावर भाजपने कारवाई केली आहे. त्यांचे लोकसभेचे तिकिटही कापले असल्याचे सांगितले.