
दिवाळी लेख : आमचं गाव जळगाव जिल्यातील रोझोदा , छोटंसं टुमदार निसर्गानं संपूर्ण वैभव भरभरून दिलेलं. वातावरण अतिशय सुंदर,प्रसन्न, आल्हाददायक, वातावरणात गारवा ,मंद, मंद हवा, पंचमहाभूतांचे संपूर्ण कृपा गावावर त्यातच परीक्षा संपलेल्या आणि दिवाळीचं सुटी लागलेले त्यामुळे आम्ही अतिशय आनंदी . आमच्या घरातील वातावरण अतिशय प्रसन्न आल्हाददायक. वडील शिक्षक असल्यामुळे नेहमीच कामात व्यस्त असतं. आई, तिच्या मैत्रिणी आणि शेजारच्या काही बायकांची दिवाळी फराळ , कपडे, शोभेच्या वस्तु, कंदील, दिवे, घर सफाई करता लागणाऱ्या वस्तू व इत्यादी. अश्या अनेक कामाची यादी व नियामन करण्यात मग्न . ह्या महिला मंडळाची मीटिंग असायची. नंतर मग सर्व महिला ह्या एकत्रितपणे बाजारात जायच्या कमीत कमी एक वस्तूसाठी तीन ते चार दुकान बघून जिथे स्वस्त मिळेल तिथे दुकानदारावर दबाव टाकायचं व शेवटी दुकानदार कंटाळून वस्तूचा भाव महत कमी करायचा. आणि मग महिलावर्ग च्या चेहऱ्यावर युद्ध जिंकल्याचा भाव असायचा अश्या रीतीने सगळी खरेदी केल्यानंतर घरी आनंदाने, प्रसन्नतेने जायच्या. नंतर मग सगळ्या महिला एकत्रित येऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन फराळ तयार करायच्या. आम्ही लहान मुलं गरम गरम फराळ हातामध्ये घेऊनच खायचो. आम्ही सर्व लहान मुलं खूप खेळायचो, गोंधळ करायचो, खूप ओरडायचो, खूप मजा करायचो. नंतर मग फटक्यासाठी बाबाच्या मागे लागायचो मग फटाके आणल्यानंतर खूप फटाके फोडायचो . मजा , धमाल करायचो.
त्याकाळी गावातील लोक सकाळी ४.०० वाजता उठायचे. आमच्या घरी पण आई वडील सकाळी लवकरी उठायचे व आपापल्या कामाला लागायचे. आम्ही पण बहीण भावंड सकाळी ५.०० वा . उठायचे आधी आघोळ करून मग मी घराच्या ओट्यावर बसून बाहेरील गंमत बघायचो. घराघरांमध्ये प्रत्येक जण कामात व्यस्त. प्रत्येकाचं घर सुंदर सजवलेलं, आकाश कंदील, रंगीत दिवे व प्रकाशाच्या तेजा मुळे सगळं अतिशय स्वच्छ दिसायचं. प्रत्येक घराच्या अंगणात तुलसी जवळ गाईच्या शेणानं अगंण स्वच्छ सारवलेले, दिवा लावलेला , सुंदर रांगोळी काढलेली. घराघरांमध्ये काही गृहिणी स्वयंपाक ,काही पूजा ,भजन, घरकाम, शेतीची तयारी अश्यारितीने उत्साहात आपापली कामे करायची. असं वाटायचं की प्रत्यक्ष स्वर्गच पृथ्वीवर अवतरला. मंत्रमुग्ध अश्या वातावरण सकाळ संपून दुपार केव्हा व्हायची समजायचे पण नाही.
घरात पण पाव्हण्याची वर्दळ असायची , ताई , ताईची मुले, आत्या, आतेभाऊ, आत्ये बहीण, मामभाऊ,बहीण अशी सर्व मंडळी घरी मुक्कामाला यायचे खूप मजा यायची. मजेत वेळ निघायचा.
दिवाळीच्या दिवशी तर नियमच; सकाळी लवकर अभ्यंग स्नान करून तयार होऊन देवपूजा दिवा, अगरबत्ती सुगंधित धूप लावावयाचा.नंतर दूध, चहा पिऊन बाहेर फटाके फोडायचे. नंतर सकाळी फराळ करायचा. घरी आली पाहुणे मुलांसोबत किल्ला बनवायचा , मातीचे भांडे बनवायचे व खूप खेळ खेळायचो. मग भूक लागल्यानंतर यथेच्छ पंचपक्वांनावर ताव मारायचो. दुपारी टीव्ही बघायचो नंतर संध्याकाळी परत बाहेर अंगणात रांगोळी तसेच घर सजावट करणाऱ्यांची मजा बघायचो व फटाके फोडायचे. सूर्यास्ताच्या वेळी लक्ष्मी पूजन कार्यक्रानिमित्त घरात पूजेत बसायचो. त्यानंतर जेवण झाल्यानंतर परत फटाके फोडायचे . नंतर रात्री झोपून जायचे अशा मंत्रमुग्ध वातावरणात दिवाळी साजरी व्हायची.
-डॉ जितेंद्र आत्माराम होले