Home Politics राम मंदिर उद्घाटन सोहळा हे राजकीय श्रेय लाटण्याचे निमित्त: संजय राऊत यांची टीका

राम मंदिर उद्घाटन सोहळा हे राजकीय श्रेय लाटण्याचे निमित्त: संजय राऊत यांची टीका

राम मंदिर उद्घाटन सोहळा हे राजकीय श्रेय लाटण्याचे निमित्त: संजय राऊत यांची टीका

नवी दिल्ली: प्रतिनिधी

अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा हे सत्ताधाऱ्यांसाठी राजकीय श्रेय लाटण्याचे निमित्त बनले आहे. त्यामुळेच संयोजकांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नाही. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून साजरा होणारा राजकीय सोहळा संपल्यानंतर आम्ही अयोध्येत जाऊन धार्मिक सोहळा साजरा करू, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला सत्ताधाऱ्यांनी ठाकरे यांना निमंत्रण दिले नाही याचे आश्चर्य वाटत नाही. बाळासाहेब ठाकरे असते तरी त्यांनाही संयोजकांनी कार्यक्रमाला बोलावले नसते. रामजन्मभूमीच्या आंदोलनात बाळासाहेब आणि शिवसेना यांचे मोठे योगदान आहे. आजही उद्धव ठाकरे आयोजित केले तर त्यांच्या नावाचा जयजयकारच होईल, असा दावाही राऊत यांनी केला. प्रभू श्रीराम ही कोणत्या विशिष्ट पक्षाची अथवा नेत्याची मालमत्ता नाही. ते सर्वांचेच आहेत, असेही ते म्हणाले.

काँग्रेसने राज्यात ४८ जागा लढवाव्या… 

आगामी लोकसभा निवडणुकीत २५ जागा मिळावे अशी मागणी महाविकास आघाडीतील घटक असलेल्या काँग्रेसने केली आहे. काँग्रेसने राज्यातील सर्व ४८ जागा लढवाव्या, अशा शब्दात राऊत यांनी काँग्रेसच्या राज्य पातळीवरील नेत्यांची खिल्ली उडवली आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीच्या वेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबरोबर आमची चर्चा झाली आहे. त्याचप्रमाणे या दिल्ली दौऱ्यात काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांच्याशीही आदित्य आणि उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली आहे. जागा वाटपाचा निर्णय दिल्लीत होणार आहे, याची राज्यातील नेत्यांना कल्पना नसावी, असेही राऊत म्हणाले.

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत येणार

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा भाग व्हावा, यासाठी आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे. वंचित बहुजन आघाडीला आपल्याबरोबर सहभागी करून घेण्यात यावे, अशीच शिवसेनेची भूमिका आहे आणि ती दिल्ली येथे काँग्रेस नेत्यांना स्पष्टपणे सांगण्यात आली आहे, असेही राऊत म्हणाले.