
नवी दिल्ली: प्रतिनिधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या परखड वक्तव्यांना घाबरून त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरविण्यासाठी कुटील डावपेच करणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात सर्व राज्यात राजधानीच्या शहरांमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने दि १२ जुलै रोजी मूक सत्याग्रह करण्यात येणार आहे, असा इशारा काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी दिला आहे.
राहुल गांधी हे मोदी सरकारचे प्रखर आणि सक्षम विरोधक आहेत. भारत जोडो यात्रेला उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी लोकसभेत एक ऐतिहासिक भाषण केले. या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी उद्योग समूह यांच्यातील संबंध उघड केले. त्यामुळे बिथरलेल्या भारतीय जनता पक्ष आणि मोदी सरकारने राहुल गांधींना लोकसभेतून बाहेर काढण्यासाठी त्यांना अपात्र ठरविण्याचा कुटील डाव खेळला, असा आरोप वेणुगोपाल यांनी केला.
त्यांच्या या कृत्याचा निषेध म्हणून दि १२ जुलै रोजी देशभरातील काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते राजधानींच्या शहरांमध्ये महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर मूक सत्याग्रह करणार आहेत, अशी माहिती वेणुगोपाल यांनी दिली.
मोदी या आडनावावर गांधी यांनी केलेल्या टिप्पणी प्रकरणी त्यांची शिक्षा रद्द करण्याच्या याचिकेला गुजरात उच्च न्यायालयाने नकार दिला असला तरीही या मागणीसाठी काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाईल, असेही वेणुगोपाल यांनी सांगितले.