
नागपूर: प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या २५ वर्षातील आर्थिक कारभाराचे लेखापरीक्षण करून त्याबाबतची श्वेतपत्रिका पुढील अधिवेशनात मांडण्यात येईल, अशी माहिती नगरविकास मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत पुरवणी मागण्यांना उत्तर देताना दिली.
नियोजन विभागाचे अपर प्रधान सचिव, नगरविकास -१ चे प्रधान सचिव आणि संचालक (वित्त – लेखापरीक्षण) यांची समिती ही चौकशी करेल, असेही त्यांनी सांगितले.
सामंत म्हणाले की, सदस्य योगेश सागर यांनी मुंबई महापालिकेच्या गेल्या २५ वर्षातील आर्थिक कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. ती मान्य करण्यात येऊन याबाबत निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केले.
मागील पंचवीस वर्षापासून मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेनेच्या ताब्यात आहे. या काळात पायाभूत सुविधा विशेषतः रस्त्यावरील खड्डे, जलनिस्सारण, झोपडपट्टी पुनर्वसन अशा अनेक बाबतीत गैरव्यवहारांचे आरोप विरोधकांकडून करण्यात आले आहेत. आगामी काळात मुंबई महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत पालिकेची सत्ता ठाकरे गटाकडून काढून हस्तगत करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट शर्थीने प्रयत्न करीत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षण हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.