Home Politics भाजप आणि अजित पवार यांच्यामुळे टिकले नाही मराठा आरक्षण: प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

भाजप आणि अजित पवार यांच्यामुळे टिकले नाही मराठा आरक्षण: प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

भाजप आणि अजित पवार यांच्यामुळे टिकले नाही मराठा आरक्षण: प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

पुणे: प्रतिनिधी

मराठा समाजाला राज्य सरकारकडून देण्यात आलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही याला भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार कारणीभूत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

मराठा समाजाचे आरक्षण नाकारण्याचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालपत्राच्या परिच्छेद ५६, ५७ मध्ये न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदविले आहे. यात आपल्यासमोर आलेल्या अहवालानुसार मराठा समाज श्रीमंत आहे, असे नमूद करून न्यायालयाने आरक्षण नाकारले आहे. हा अहवाल न्यायालयासमोर आला नसता तर आरक्षण नाकारले गेले नसते. हा सर्व खेळ भाजप आणि अजित पवार यांनी केलेला आहे. त्यामुळे मराठा समाजाने यांच्यापासून सावध राहावे, असा इशारा आंबेडकर यांनी दिला आहे.

मराठे आणि इतर मागासवर्गीय यांनी आपसात लढू नये

इतर मागासवर्गीयांचे आरक्षण आणि गरीब मराठा समाजाला दिले जाणारे आरक्षण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या हे दोन समाज एकमेकांना भिडत आहेत. मात्र, गरीब मराठ्यांना वेगळे आरक्षण देणे शक्य आहे. त्यामुळे मराठी आणि इतर मागासवर्गीय यांनी आपसात लढू नये, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.

भाजप खेळत आहे माकडाचा खेळ

भारतीय जनता पक्षाने मराठा आरक्षणाचा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोपविला आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पक्ष इतर मागासवर्गीयांना चुचकारत आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणालाच आरक्षण द्यायचे नाही. सर्वांचेच आरक्षण काढून घ्यायचे, असा भाजपचा डाव आहे. हा डाव इतर मागासवर्गीयांनी ओळखावा. भाजप रामाचा भक्त आहे इतर मागासवर्गीय यांचा नाही, असेही आंबेडकर म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांना सल्ला

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आंदोलनाला विपरीत वळण लावण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन प्रयत्न केले जाऊ शकतात. आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जेवणात जुलाबाचे औषध घातले जाऊ शकते. त्यामुळे त्यांनी सावध राहावे. ठराविक लोकात जेवण्यापेक्षा पंगतीत जेवण करावे, असा सल्ला आंबेडकर यांनी दिला आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणावर तोडगा निघण्याबाबत आपल्याला शंका आहे, असेही त्यांनी नमूद केले.