Home Politics पवारांवरील आरोप सिद्ध करा अथवा त्यांची माफी मागा: प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधानांना इशारा

पवारांवरील आरोप सिद्ध करा अथवा त्यांची माफी मागा: प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधानांना इशारा

पवारांवरील आरोप सिद्ध करा अथवा त्यांची माफी मागा: प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधानांना इशारा

पुणे : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल करावे अथवा हे आरोप बिन बुडाचे असल्यास पंतप्रधानांनी पवार यांची बदनामी केल्याबद्दल दहा दिवसाच्या आत माफी मागावी. अन्यथा त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

मध्य प्रदेशातील भोपाळ येथे भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीत पंतप्रधानांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर सिंचन घोटाळा, सहकारी बँक घोटाळा आणि बेकायदेशीर खाण घोटाळा यासह अनेक घोटाळ्यांचे आरोप केले. या भ्रष्टाचाराची रक्कम तब्बल ७० हजार कोटी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जर देशाचे पंतप्रधान असे आरोप जाहीरपणे करत असतील, तर ते ठोस माहिती आणि पुराव्यांवरून येत असावेत, जे त्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या ED, CBI, इन्कम टॅक्स या एजन्सींच्या माध्यमातून खात्री केलेल असावेत. म्हणून, आम्ही पंतप्रधानांना विनंती करतो की त्यांनी १० दिवसांच्या आत भ्रष्टाचारात गुंतलेल्या व्यक्तीवर फौजदारी खटले दाखल करावेत आणि ७० हजारकोटींचा समावेश असलेल्या या आरोपांसाठी पुनर्प्राप्ती प्रक्रिया सुरू करावी. अन्यथा खोटे आरोप करून बदनामी केली म्हणून राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टी आणि शरद पवार यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे.

निवडणुकीतील फायद्यासाठी ठोस पुराव्याशिवाय कोणत्याही पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाची बदनामी करणे नैतिकतेला धरून नाही आणि राजकारणात ते केले जाऊ नये. एकतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरोप सिद्ध करावेत किंवा शरद पवार यांची बदनामी केल्याबद्दल त्यांची माफी मागावी. दहा दिवसांत पंतप्रधानांनी माफी न मागितल्यास तीव्र आंदोलन करू. शरद पवार हे विरोधकांच्या इंडिया आघाडीचे भाग आहेत, त्यामुळे आम्ही काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करतो, असेही आंबेडकर म्हणाले.