Home Uncategorized निष्ठावंतांच्या पाठीशी पक्षाने उभे राहावे;  राजकीय वर्तुळातील जाणकारांचे मत  

निष्ठावंतांच्या पाठीशी पक्षाने उभे राहावे;  राजकीय वर्तुळातील जाणकारांचे मत  

निष्ठावंतांच्या पाठीशी पक्षाने उभे राहावे;  राजकीय वर्तुळातील जाणकारांचे मत  

पिंपरी,ता. १८ (विश्व सह्याद्री ) : गेल्या पाच वर्षांत ज्यांना आपल्या कौशल्याचा ठसा उमटवता आला नाही. स्वहित साधत असताना समाज सेवेला दुय्यम स्थान  दिले, अशा प्रभावहीन कार्यकर्त्यांना आता पुन्हा तिकीट मिळणार नाही, या भीतीने ग्रासल्यानेच त्यांची पळापळ सुरु झाली आहे. त्यामुळे अशा कार्यकर्त्यांना फार महत्व देण्याची गरज नसल्याचे राजकीय जाणकारांचे  म्हणणे आहे. या उलट सर्वच राजकीय पक्षांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

सध्या अनेक माध्यमांतुन सोम्यागोम्याच्या  पक्ष प्रवेशाच्या बातम्या झळकत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर आयाराम-गयारामांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राजकीय पक्षांकडून आपल्या सोयीने त्याचे अर्थ लावले जात आहेत.  ‘राहिले ते मावळे अन, गेले ते कावळे’, ‘ही तर आमचीच बी टीम, अजून काही पाइपलाइनमध्ये आहेत अशा प्रतिक्रिया विशेषतः भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिल्या जात आहेत. परंतु , ज्यांना गेल्या पाच वर्षांत आपल्या कार्याचा ठसा उमटवता आला नाही, जे आजवर निष्क्रिय राहिले अशा कार्यकर्यांवर आपल्या अस्तित्वासाठी पक्षांतराची वेळ आली आहे. त्यांचे आज  प्रवेश होतीलही पण   पुढे काय ?  तिथे त्यांचा ठसा उमटेल ? पक्षात वजन वाढेल ? तेंव्हा त्यांना विशेष महत्व देण्याची आवश्यकता नाही, असे जाणकारांचे  मत  आहे.   

निष्ठावंतांना सुगीचे दिवस 
पाच वर्षांपूर्वी २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ज्या अडचणीतून जात होती, त्यावेळी हेच आयाराम आपला पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झाले होते. आता तिथे कोणी विचारत नाही म्हटल्यावर पुन्हा स्वगृही परतण्याची धडपड सुरु आहे. परंतु, कोणाला प्रवेश द्यायचा, कोणाला नाही याचा विचार भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व राजकीय पक्षांनी करायला हवा; नाही तर उगाच खोगीर भरती करून तिकिटांसाठी गर्दी दाखवण्यात काहीच अर्थ नाही. अशा संधिसाधूंना जनता  पुरेपूर ओळखते. कळपाने होणाऱ्या प्रवेशांमुळे पक्षातील निष्ठावंत इच्छुकांवर अन्याय होऊ शकतो. उलट निवडून येण्याचा निकष यांबरोबरच निष्ठावंत कार्यकर्त्याना प्राधान्य दिल्यास भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या पक्षांची प्रतिमा उंचावण्यास मदत होईल. तेव्हा निष्ठावंतांना सुगीचे दिवस येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये यावेळी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत पाहवयास मिळणार आहे. परंतु राज्यात महा आघाडीचे सरकार असल्याने राष्ट्रवादीने  शिवसेना व काँग्रेसबरोबर इथेही आघाडी करावी अशी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस कसा प्रतिसाद देते त्यावर इच्छुकांच्या तिकिटाचे भवितव्य ठरणार आहे. तेंव्हा सध्या सुरु असलेल्या पक्षांतराला फारसे महत्व उरणार नाही असेही जाणकारांनी स्पष्ट केले आहे.