Home Pune निवडणुकीच्या तोंडावर ‘दल बदला’चे वारे

निवडणुकीच्या तोंडावर ‘दल बदला’चे वारे

निवडणुकीच्या तोंडावर ‘दल बदला’चे वारे

पुणे: महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात विविध पक्षातील इच्छुकांची धावपळ सुरू झाली असून त्यात सर्वाधिक लगबग एका पक्षातून दुस-या पक्षात उडी मरणाऱ्यांची असून या निवडणुकीत मागच्या प्रमाणेच दल बदलाचे वारे मोठ्या प्रमाणात घोंघावण्याची चिन्हे आहे.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे इच्छुकही आपल्याला सध्याच्या पक्षाकडून तिकीट मिळेल की इतर कोणत्या पक्षाशी घरोबा करावा लागेल याच्या चाचपणीला लागले आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरविंद शिंदे यांचे पुतणे प्रणय शिंदे यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शिंदे यांचा पक्षात समावेश करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यामुळेच प्रत्येकजण भाजपकडे आकृष्ट होत आहे. त्यामुळेच भाजप जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला आहे.

त्या आधी अभाजपच्या विद्यमान नगरसेविका शीतल सावंत यांचे पती आणि माजी महापौर भारत सावंत यांचे पुत्र जय सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शीतल सावंत मागील कार्यकाळात काँग्रेसच्या नगरसेविका होत्या तर विद्यमान कार्यकाळात त्या भाजपच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या. सावंत यांना पक्षात घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी, भाजपचे किमान २५ नगरसेवक निवडणुकीपूर्वी ‘राष्ट्रवादी’त प्रवेश करणार आहेत, असा दावा केला होता.

काही काळापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका आणि धडाडीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करून समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

या पार्श्वभूमीवर शहर भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, पक्षातील एक-दोन नेते इकडे तिकडे गेल्याने पक्षाचे काहीही नुकसान होणार नाही. उलट काही काळातच अन्य राजकीय पक्षांचे अनेक बलाढ्य नेते लवकरच भाजपमध्ये सामील होतील आणि त्यामुळे पक्ष आणखी मजबूत होण्यास मदत होईल, असा दावाही त्यांनी केला.

सन २०१७ च्या निवडणुकीत वाऱ्याच्या दिशेचा वेध घेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेसह बहुतेक सर्वच राजकीय पक्षांच्या नगरसेवक आणि प्रमुख नेत्यांनी भाजपच्या जहाजात उडी घेतली होती. त्यावेळी केंद्रासह राज्यातही भाजप सत्तेत होता. त्या निवडणुकीत भाजपने १६२ पैकी १०० जागांवर विजय मिळवत पूर्ण बहुमत प्राप्त केले आणि महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता उलथवून प्रथमच महापालिका ताब्यात घेतली.

महापालिकेची ५ वर्षांची मुदत १५ मार्च रोजी संपत आहे आणि पुढील कार्यकाळासाठी निवडणुकीच्या तारखा केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. पुढील कार्यकाळासाठी मतदारसंघांची रचना बदलण्यात आली असून नव्या महापालिकेत एकूण १७३ नगरसेवक निवडून जाणार आहेत. दरम्यान, महापालिका प्रशासनाने आगामी निवडणुकांसाठी प्रभागांच्या पुनर्रचित नकाशावर सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. भाजपने या प्रभागरचनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल अशी प्रभागरचना करण्यात आली असून त्यावर आक्षेप नोंदवून त्यात बदल करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.