
हर्षवर्धन पाटील यांचे देवेंद्र फडणवीस यांना साकडे
इंदापूर: प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील कट्टर राजकीय वैमनस्य दूर करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात अंकिता पाटील यांनी प्रत्यक्षात अजित पवार यांच्या विरोधातील. तक्रारींचा पाढाच वाचला. देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्याचे पालकत्व घ्यावे आणि तालुक्याचा विकास करावा असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी या मेळाव्यात बोलताना केले.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर कुठल्या गटाची ताकद किती, याच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही. आपल्या कार्यकर्त्यांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत नाही. आमचे सरपंच अपात्र ठरवले जातात. तालुक्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे. या सगळ्याचा परिणाम महायुतीच्या प्रतिमेवर होत आहे. त्यामुळे फडणवीस यांनी या तालुक्याचे पालकत्व घ्यावे आणि विकास करावा, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
… हे फोन तेवढे थांबवा
इंदापूर तालुक्यातील पोलीस आपले काम चोखपणे पार पाडत आहेत. मात्र, काही वेळा त्यांच्यावर दबाव येतो. खोटेनाटे गुन्हे दाखल केले जातात. कोणी चुकीचे वागले तर त्यांच्यावर जरूर गुन्हे दाखल करा. मात्र, काही वेळा कोणालातरी मारहाण होते आणि मारहाण करणाराच आधी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करतो. मग पोलिसांना ‘वरून’ कोणाचा तरी फोन येतो आणि खोटे गुन्हे दाखल होतात. हे फोन तेवढे थांबवा, अशी मागणी अंकिता पाटील यांनी केली आणि हर्षवर्धन पाटील यांनीही त्याची री ओढली.