Home Maharashtra Special ‘ऑनलाईन एन्टरटेन्मेंट’ आणि ‘चॅट जीपीटी’हे रंगभूमीसाठी पर्याय ठरू शकत नसल्याचा परिसंवादात सूर

‘ऑनलाईन एन्टरटेन्मेंट’ आणि ‘चॅट जीपीटी’हे रंगभूमीसाठी पर्याय ठरू शकत नसल्याचा परिसंवादात सूर

‘ऑनलाईन एन्टरटेन्मेंट’ आणि ‘चॅट जीपीटी’हे रंगभूमीसाठी पर्याय ठरू शकत नसल्याचा परिसंवादात सूर

१०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन

पिंपरी : प्रतिनिधी

ऑनलाईन एन्टरटेन्मेंट’ आणि ‘चॅट जीपीटी’ हे रंगभूमीसाठी पर्याय ठरू शकत नाही. रंगभूमीवर आर्टिफिशियल इंटीलीजन्स पेक्षा इमोशनल इंटीलीजन्स महत्वाचा असतो. त्यामुळे या तंत्रज्ञानाला घाबरण्यापेक्षा ते तंत्रज्ञान समजून घ्या. त्यामुळे या तंत्रज्ञानाचे गुलाम न होता त्याचा आपल्या लेखनासाठी फायदा कसा करून घ्यायचा हे लेखकांना कळेल. त्यामुळे ‘ऑनलाईन एन्टरटेन्मेंट आणि ‘चॅट जीपीटी’चे धोके जरी असले तरी ते समजून घेऊन त्याचा उपयोग करून घ्यावा, असा सूर आज परिसंवादात उमटला.

१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात आज दुसऱ्या दिवशी ”ऑनलाईन एन्टरटेन्मेंट आणि ‘चॅट जीपीटी’चा रंगभूमीवर परिणाम होतोय का?’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. नाट्य सूर्यमाला सभामंडपात पार पडलेल्या या परिसंवादात अभिनेते सुनील बर्वे, ज्येष्ठ नाटककार विजय केंकरे, लेखक नीरज शिरवईकर सहभागी झाले होते.  त्यांच्याशी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाहक अजित भुरे यांनी संवाद साधला. यावेळी नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद पिंपरी शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष किरण येवलेकर, तळेगाव शाखेचे सुरेश धोत्रे, जयराज काळे आदि मान्यवर उपस्थित होते.

या परिसंवादात बोलताना नाटककार विजय केंकरे म्हणाले, ऑनलाईन एन्टरटेन्मेंट आणि ‘चॅट जीपीटी’ मुळे क्षणिक काळाचे नाटकार, लेखक तयार होतील अशी भीती आहे. कोरोना काळात चॅट जीपीटी किंवा एआय चा उपयोग झाला असला तरी आता असे लेखक फार काळ टिकणार नाही. कारण हे तंत्रज्ञान ढोबळ स्वरूपाचे आहे. लेखकाच्या सृजनशीलतेला पर्याय नाही. शिवाय रंगभूमीवर होणारे प्रयोग हे केवळ नाटककारच करू शकतात चॅट जीपीटी किंवा ए आय ते लिहू शकत नाही. असे प्रयोग झाले तरी ते टिकणार नाहीत. नाटक आणि सिनेमा ही टिकाऊ गोष्ट आहे ही जाणीव लेखकाला असेल तर चॅट जीपीटी किंवा एआय हा धोका होऊ शकत नाही.

सुनील बर्वे म्हणाले, कोरोना काळात आम्ही कलाकारांनी मिळून ऑनलाईन ड्रामा कॉम्पिटिशन सुरू केली होती. कलाकार निराशेच्या गर्तर्तेत जाऊ नये, त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी ही स्पर्धा आम्ही घेतली होती. पण कोरोना नंतर प्रेक्षक नाट्यगृहात परत आले. ऑनलाईन हे माध्यम मर्यादीत आहे. रंगभूमीवर आर्टिफिशियल इंटीलीजन्स पेक्षा इमोशनल इंटीलीजन्सला जास्त महत्व आहे.

लेखक नीरज शिरवईकर म्हणाले, चॅट जीपीटी किंवा एआयचा वापर मी केलेला आहे. ते एक साचेबद्ध माध्यम आहे. त्यात कोणत्याही प्रकारच्या भावना नसतात. त्यामुळे चांगल्या लेखकांनी याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करून घ्याव्या. हे तंत्रज्ञान कसं वापरायचं हे कळालं तर लेखकांना यांची मदतच होईल.