
पिंपरी – ऑटो रिक्षा, टॅक्सी चालक संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याने जबाबदारी वाढली आहे. टॅक्सी, रिक्षा चालकांचे अनेक प्रश्नांना न्याय द्यायचा आहे. दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडू, असे प्रतिपादन ऑटो टॅक्सी, रिक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली.
ऑटो टॅक्सी, रिक्षा फेडरेशनची नुकतीच दिल्ली येथे राष्ट्रीय परिषद पार पडली. या मध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदी बाबा कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली. पद स्वीकारल्यानंतर कांबळे यांचे मंगळवारी (दि. २०) पिंपरी चिंचवड शहरात आगमन झाले. या वेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत, टपरी, पथारी, हातगाडी संघटना, असंघटित कामगार, कष्टकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी एचए येथील छत्रपती शिवाजी महाराज, पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास बाबा कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. लोहा पंचायत समिती उपाध्यक्ष व राष्ट्रीय सदस्यांचे उपाध्यक्ष नरेंद्र गायकवाड नादेड यांचाही सत्कार करण्यात आला,
लोहा बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गंध अध्यक्ष शिवशंकर उबाळे, कष्टकरी कामगार पंचायत कार्याध्यक्ष बळिराम काकडे,घरकाम महिला सभा अध्यक्ष आशा कांबळे, मधुरा डांगे, स्वाती शेलार, संगीता लंके ,महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण शेलार, रिक्षा ब्रिगेडचे बाळासाहेब ढवळे, उपाध्यक्ष हिरामण गवारे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कांबळे म्हणाले की, ऑटो टॅक्सी, रिक्षाच्या प्रश्नांवर गेल्या अनेक वर्षांपासून संघटनेच्या वतीने आंदोलने, मोर्चे, ठिय्या आंदोलन करत आहे. शासन दरबारी दखल घेतली जाते. या कार्याची दखल घेत देशभरातील ऑटो टॅक्सी, रिक्षा फेडरेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आपली निवड करण्यात आली. आता पहिल्यापेक्षा जास्त जबाबदारी वाढली आहे. स्वागत हार तुरे थांबवुन आता पुढेही जोमाने काम करू,असे त्यांनी स्पष्ट केले.