
पंतप्रधान मोदी यांचे मतदारांना आवाहन
लखनौ: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी सभेत उत्तर प्रदेशमधील मतदारांना भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्याच्या विकासाशिवाय भारताचा विकास होऊ शकत नाही. त्यामुळे भाजपाला मत म्हणजेच भाजपला मत दिल्यासारखे आहे. राज्यात भाजप सत्तेवर आल्यास तुम्ही सुरक्षित असाल. जर भाजपाविरोधक सत्तेवर आले तर गुन्हेगारांचे फावेल, असेही मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी खराब हवामानामुळे बिजनौर येथे हेलिकॉप्टरने जाहीर सभेसाठी येऊ शकल्यामुळे व्हिडीओद्वारे त्यांनी मतदारांना संबोधित केले. तुम्ही तुमचे मत देणार आहात, तेव्हा देशासाठी मतदान करत आहात हे लक्षात ठेवा, असे मोदी यावेळी म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत भाजपला विरोध करणाऱ्यांचा विजय झाला तर राज्याचे भवितव्य अंध:कारमय असणार आहे. जे लोक जातीच्या आधारावर मते मागत आहेत, त्यांना सत्तेवर आल्यावर फक्त त्यांच्याच कुटुंबाची आठवण येते, असा आरोप करीत मोदी यांनी समाजवादी पक्षावर निशाणा साधला. या उलट, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पाच वर्षांत विकास काही क्षेत्रांपुरता मर्यादित न राहता सर्वांगीण विकासाकडे लक्ष केंद्रित केले आहे, असा दावाही त्यांनी केला.
शेतकरी आंदोलनामुळे शेतकरी वर्गात भाजप आणि केंद्र सरकार यांच्याबद्दल असलेली नाराजी लक्षात घेऊन मोदी यांनी केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचा पाढाच मतदारांसमोर मांडला. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले. चौधरी चरणसिंग यांचा वारसा सांगणारे जनतेची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप करतानाच मोदी यांनी वीज पुरवठा, खत पुरवठा, पाणी पुरवठा, शेतीमालाची दुप्पट दराने खरेदी; यासाठी योय सरकारचे कौतुक केले.
योगी यांच्या राजवटीत गुन्हेगारांना गजाआड करण्यात आले आहे. हे सर्व गुन्हेगार सरकार बदलण्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे त्यांना मोकळे रान मिळणार आहे. त्यांना ‘माफिया राज’ सरकार परत आणायचे आहे. जातीच्या नावावर समाजात फूट पाडायची आहे. त्यासाठीच भाजपला रोखण्याची त्यांची इच्छा आहे. हे सर्व टाळायचे असेल तर भाजपाला साथ द्या; असे आवाहन मोदी यांनी केले.