
पनवेल: प्रतिनिधी
मागील सलग ४८ तास सुरू असलेल्या संततधार पावसामुळे इर्षाळगडाच्या पायथ्याला असलेल्या इरशाळवाडीतील ३० हून अधिक घरांवर दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले असून पन्नास हून अधिक जण ातीच्या ढिगार्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे.
मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात दोन दिवसापासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. या सततच्या पावसामुळे इरशाळगडाच्या डोंगरावरील सैल झालेली माती आणि दगड गडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीतील घरांवर मध्यरात्रीच्या सुमारास कोसळले.
दुर्घटनाग्रस्त ठिकाण हे नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबी धरणाच्या परिसरात आहे. इरशाळवाडी या वाडीमध्ये सुमारे 40 सेक घरे असून ३०० लोकांची वस्ती असल्याची माहिती मिळते. वाडीतील बहुसंख्या ग्रामस्थ हे आदिवासी ठाकूर समाजाचे आहेत.
दुर्घटना घडल्याची माहिती मिळतात आपत्ती व्यवस्थापन विभागाची दोन पथके आणि पोलीस पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. मात्र, अंधार आणि कोसळणारा पाऊस यामुळे मदत कार्यात मोठ्या प्रमाणात अडथळे आले. सकाळपासून बचाव आणि मदत करायला अधिक वेग देण्यात आला आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांनी अन्य काही मंत्र्यांसह घटनास्थळी धाव घेतली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ते देखील आज घटनास्थळाला भेट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.