
मुंबई: प्रतिनिधी
विरोधकांच्या एकजुटीतून साकारलेल्या इंडिया आघाडीला मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्ष घाबरले आहे. या भीतीतूनच त्यांना एक देश, एक निवडणूक हा तद्दन माथेफिरू प्रकार सुचला आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
केंद्र सरकारने एक देश, एक निवडणूक अमलात आणण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर त्यासाठी संसदेत विधेयक मांडले जाणार आहे. सरकारने या महिन्यात संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविले असून या अधिवेशनात एक देश, एक निवडणूक यासाठी विधेयक मांडले जाईल अशी शक्यता आहे.
‘एक निशाण, एक संविधान’च्या धर्तीवर मोदी सरकारने “एक देश, एक निवडणूक” हा नवा फुगा सोडला आहे. प्रत्यक्षात जम्मू कश्मीर मध्ये काय घडले, असा सवाल करतानाच राऊत यांनी केंद्र सरकारने आधी जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक घ्यावी. मणिपूर मध्येही निवडणूक घ्यावी, अशी मागणी केली आहे.
एकत्रित निवडणुकीपेक्षा निष्पक्ष निवडणूक महत्त्वाची
भारतात एकत्र निवडणूक होण्यापेक्षाही सर्व निवडणुका निष्पक्ष होणे अधिक महत्त्वाचे आहे. मात्र, सरकारच्या दबावाखाली भ्रष्ट निवडणूक आयोग जोपर्यंत निवडणुकांचे कामकाज पहात आहे तोपर्यंत या देशात निष्पक्ष निवडणूक होणे शक्य नाही, अशी टीकाही राऊत यांनी केली. एक देश, एक निवडणूक हा एक निव्वळ राजकीय बुडबुडा आहे, असेही ते म्हणाले.