
नवी दिल्ली: प्रतिनिधी
असुरक्षित कर्जाबाबत बँक आणि वित्तीय संस्थांनी वेळीच सावध होऊन योग्य काळजी घ्यावी. असुरक्षित कर्जांचा फुगा फुटून घराने पेट घेईपर्यंत वाट पाहू नये, असा इशारा रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिला.
रिझर्व बँकेने असुरक्षित कर्जाबाबत नियम अधिक कठोर केले आहेत. भावी काळात उद्भवू शकणारा धोका टाळण्यासाठी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले आहे, असे दास यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आर्थिक क्षेत्र सुरक्षित राखण्यासाठी सावधपणा आणि विवेक हेच बँका आणि नियामक संस्था या दोघांचेही तत्त्वज्ञान असले पाहिजे, असेही ते म्हणाले.
असुरक्षित ग्राहक कर्जांचे धोका गुणांकन रिझर्व बँकेने २५ टक्क्यांवरून थेट १२५ टक्क्यांपर्यंत वाढविले आहे. रिझर्व बॅंकेच्या या निर्णयामुळे असुरक्षित कर्जांच्या मागणीत घट होण्याची शक्यता नाही तर यामुळे कर्ज वितरण आणि परतफेड यामध्ये सुसूत्रता येईल, असा दावाही त्यांनी केला.
ऑनलाइन कर्ज वितरणात पारदर्शकता आणि विश्वासार्हता यावी यासाठी रिझर्व बँकेच्या वतीने एक सार्वत्रिक धोरण व नियमावलीची चौकट आखण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले