Home Maharashtra Special अतिरेक्यांचा उधळला डाव, भ्रष्ट आणि गलथान प्रशासनाचे काय?

अतिरेक्यांचा उधळला डाव, भ्रष्ट आणि गलथान प्रशासनाचे काय?

अतिरेक्यांचा उधळला डाव, भ्रष्ट आणि गलथान प्रशासनाचे काय?

राष्ट्रीय तपास यंत्रणेने जुलै महिन्यात आणि त्यानंतर मागच्या महिन्यात पुण्याच्या कोंढवा येथील इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंधित लोकांना गजाआड केले आणि त्यातून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई पासून ५० किलोमीटरवर असलेल्या पडघा या गावात सीरियाच्या धर्तीवर उभारलेल्या स्वतंत्र, स्वयंभू दहशतवादी राजधानीचे बिंग उघडकीला आले. या दहशतवाद्यांनी परस्पर बदलून अल शाम केले आहे.

या गावाला इसिसची भारतातील राजधानी बनवली ते साकिब नाचन या दोन वेळा १०-१० वर्ष कारावास भोगून आलेल्या या अतिरेक्यांने मुंबईवर ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ला चढविण्याचा कट रचला होता तो एनआयएच्या कारवाईने उध्वस्त झाला. एनआयएच्या छाप्यात या पडघा गावात ४० ड्रोन, हमास या दहशतवादी संघटनेचे झेंडे, स्फोटके बनविण्याचे साहित्य, युवकांची माथी भडकावून त्यांना दहशतवादाकडे आकृष्ट करणारे साहित्य आढळून आले. तसेच या भणंग वाटणाऱ्या माणसाच्या घरात अर्धा कोटी रुपयांच्या आसपास रोकड आढळून आली. या दहशतवादी विचारसरणीने भरलेल्या नाचन कुटुंबीयांची अनेक बँक खाती असून त्यात मध्य पूर्वेतील देशातून मोठ्या रकमा जमा झाल्या आहेत. त्याचप्रमाणे या दहशतवादी टोळक्याने रेल्वेत नोकरी करणाऱ्या एका कारखान्याला हाताशी धरले असून त्याच्यामार्फत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय उपचारांच्या देयकांच्या लाखो रुपयांच्या रकमा त्यांच्या खात्यात जमा झाल्या आहेत.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने जेरबंद केलेल्या दहशतवाद्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार इसिसशी संबंधित महाराष्ट्रात कार्यरत असलेले मोठे रॅकेट उध्वस्त करण्यात यश मिळाले असले तरीही, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईलगत पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला आणि दोन मोठ्या शिक्षा भोगलेला एक दहशतवादी एका गावाला आपली स्वयंपूर्ण राजधानी बनवतो. त्या ठिकाणी आपल्या दहशतवादी गटात तरुणांची भरती करतो. त्यांना प्रशिक्षण देतो. दहशतवादी हल्ल्यांचे कट रचतो. त्यासाठी लागणारे साहित्य जमा करतो. त्याच्या वापराचे प्रशिक्षण आणि सराव नवशिक्या दहशतवाद्यांना देतो. दहशतवादी कारवायांसाठी पैसा गोळा करतो आणि त्याचा पत्ता आपल्या गुप्तचर यंत्रणा आणि विशेषतः स्थानिक पोलिसांना लागत नाही हे केवळ आश्चर्यकारक नव्हे तर अविश्वसनीय आहे.

बाबरी मशीद उध्वस्त झाल्याचा सूड म्हणून मुंबईत सन १९९१ मध्ये घडवून आणलेल्या साखळी बॉम्बस्फोटात सहभागी असल्या प्रकरणी याच साकिब नाचन याने दहा वर्षाची शिक्षा भोगली आहे. त्यानंतरही दहशतवादी हल्ल्याच्या गटात सामील असल्याबद्दल त्याने तुरुंगवास भोगला. देशाच्या सुरक्षेला आव्हान देण्यासारख्या गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगून आलेल्या या सराईत दहशतवाद्याच्या हालचालींवर स्थानिक पोलिसांनी आणि गुप्तचर यंत्रणांनी ही डोळ्यात तेल घालून नजर ठेवणे अपेक्षित असताना हा दहशतवादी एका छोट्याशा गावात आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेची स्वयंघोषित राजधानी उभारूच कसा शकतो, हा कळीचा सवाल आहे. स्थानिक पोलीस आणि प्रशासन यांच्या संभाव्य भ्रष्टाचारातच या ‘अल शाम’ची पाळेमुळे रुजल्याची सर्वाधिक शक्यता आहे. जरी तसे नाही असे समजले तरीही या दहशतवाद्याच्या कृत्यांकडे पोलिसांनी अन्य तपास यंत्रणांचे अनावधानाने दुर्लक्ष झाले असेल तरीही देशाच्या सुरक्षेला घातक ठरणाऱ्या या दुर्लक्षालाही क्षमा असू शकत नाही. पडघ्याच्या निमित्ताने हाती लागलेल्या दहशतवाद्यांचे एनआयए काय करायचे ते करेलच. त्यांच्या निधी संकलनाच्या कृत्याची दखल सक्तवसुली संचालनालयाने घेतलीच आहे. मात्र, साकिब आणि त्याच्या साथीदारांना रान मोकळे सोडणाऱ्या भ्रष्ट किंवा गलथान स्थानिक पोलीस आणि प्रशासनाचे काय?