
पुणे: प्रतिनिधी
अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अशी लाखो कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस हा आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष आहे. आघाडीच्या राजकारणाला येणाऱ्या मर्यादा लक्षात घेता अजित दादांचे मुख्यमंत्रीपद हा प्रश्न सध्या तरी उद्भवत नाही, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
आम्ही आता महायुतीचे अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक आहोत. सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेण्याच्या वेळीच मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाली आहे. केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात महायुती म्हणून एकत्र काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, विनायक राऊत यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करणे आपल्याला संयुक्तिक वाटत नाही. मागील काही काळापासून केवळ समोरच्यांवर चिखलफेक करण्यासाठी माध्यमांच्या समोर जाण्याची प्रवृत्ती मूळ धरू लागली आहे. मात्र, आपल्याला अशा प्रकारच्या राजकारणात रस नाही. जनतेच्या आणि राज्याच्या विकासाच्या दृष्टीने सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची आपली भूमिका आहे, असेही तटकरे यांनी नमूद केले.
निधीवाटप अथवा अन्य कोणत्याही मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या आमदारांमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यासह सर्वच पक्षाच्या आमदारांना योग्य पद्धतीने निधीचे वाटप झाले आहे, असा दावाही तटकरे यांनी केला